लग्नमंडपाला पडदे लावताना वीजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
लग्न मंडपाला पडदे बांधताना वीजेचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली. तिसरा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पांडुरंग बुद्धाची भट्टेवाड आणि साईनाथ आनंदराव भट्टेवाड अशी मयत तरुणांची नावे आहेत. तर शिवप्रसाद राजाराम भट्टेवाड हा गंभीर जखमी आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
बोरगांव (ह) येथील एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी लोखंडी पाईपपासून पोर्टेबल मंडप फिटींग करण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना अचानक जोराचा वारा सुटल्याने अर्धवट अवस्थेत असलेला मंडप उचलला गेला आणि वर असलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीला टेकला. त्यामुळे सर्व मंडपात वीजप्रवाह उतरला.
यामुळे वीजेचा शॉक लागून पांडुरंग बुद्धाची भट्टेवाड, साईनाथ आनंदराव भट्टेवाड आणि शिवप्रसाद राजाराम भट्टेवाड हे जखमी झाले. तिघांनाही तातडीने हदगांव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथून त्यांना नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. मात्र शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून पाडुरंग आणि साईनाथ यांना मयत घोषित केले.
नांदेड येथून शवविच्छेदन करून आणल्यानंतर दोन्ही मृतदेह महावितरणच्या कार्यालयात ठेवण्यात आले. केवळ महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे निष्पाप तरुणांना प्राण गमवावा लागला. त्यामुळे गावकरी व नातेवाईकांनी महावितरणच्या कार्यालयासमोर मृतदेह ठेवत धरणे आंदोलन केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List