औरंगजेबाला मराठी माणसाचं राज्य मोडता आलं नाही; शहांनाही मोडू देणार नाही! – जयंत पाटील
अफगाणिस्तानहून कांदा आयात करत शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव सरकारने आखला आहे असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नरमध्ये शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.
अहमदशहा अबदाली अफगाणिस्तानहून आला आणि पानीपतची लढाई झाली. आता त्याच अफगाणिस्तानतून अमित शहा आणि त्यांच्या सरकारने कांदा आणला आहे. त्यामुळे कांद्याचे दर कोसळत आहेत. मराठा सैन्याचे पानीपत झाले तिथून शहा आणि त्यांच्या सरकारने कांदा आणला आणि मराठी शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव आखला आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळू नये अशी भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी घेतली आहे असेही ते यावेळी म्हणाले.
शेतीमालाचा दर वाढायला लागला की सरकारच्या पोटात गोळा येतो. शेतीमालाचा कसा दर पडेल यासाठी जगातून कांदा, सोयाबीनचे तेल हुडकून काढतात आणि शेतकऱ्याचे कंबरडे मोडतात. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही सरकारला कांदा रडवणार, सोयाबीन रडवणार, कपाशी रडवणार, तसेच सर्व पिक विमांचे प्रश्न रडवणार, असेही जयंत पाटील म्हणाले.
शहांना मराठी राज्य मोडू देणार नाही!
हे लोक म्हणतात महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखा. निवडणुका जम्मू कश्मीरमध्ये, हरियाणामध्ये लागल्या आहेत आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आढावा घेत आहेत. औरंगजेब 26 वर्षे महाराष्ट्रात राहिला, पण मराठी माणसाचे राज्य त्याला मोडता आले नाही. शहांनाही आम्ही हे मराठी राज्य मोडून देणार नाही असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List