बिहारमध्ये मृत्युचं तांडव; जितिया व्रतानिमित्त नदीत उतरलेले 49 जण बुडाले, 41 जणांचा मृत्यू
देशभरामध्ये बुधवारी जितिया व्रत पाळण्यात आले. याला बिहारमध्ये गालबोट लागले असून जितिया व्रतानिमित्त गंगा नदीमध्ये उतरलेले 49 भाविक बुडाले. यापैकी 41 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात महिलांसह मोठ्या प्रमाणात मुला-मुलींचा समावेश आहे.
औरंगबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अंघोळीसाठी तलावात उतरलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला. यात 2 महिलांचा आणि 6 मुलींचा समावेश आहे. यासह सारण जिल्ह्यातही आईसोबत अंघोळीला गेलेल्या पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला. तर कैमूर जिल्ह्यात जितिया सणावेळी नदीत आणि तलावात उतरलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
रोहतास जिल्ह्यातील डिहरी पाली पुलाजवळही अशीच घटना घडली. सोन नदीमध्ये अंघोळीसाठी उतरलेल्या 13 वर्षाचा मुलगा बुडाला. तर मोतीहारी जिल्ह्यातील कल्याणपूर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या वृंदावन परसौनी येथे आई आणि मुलीसह दोन अन्य मुलांचा बुडून मृत्यू झाला. तर कल्याणपूर येथे तीन मुली बुडाल्या.
राजधानी पाटणातील बिहटा पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या अमनाबाद हलकोरिया चक गावामध्ये सोन नदीमध्ये अंघोळीला उतरलेल्या आईसह 14 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी एका महिलेने आणि दोन तरुणींनी नदीत उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्या देखील बुडाल्या. यामुळे खळबळ उडाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List