जायकवाडीचे 18 दरवाजे दुसर्यांदा उघडले! नदीपात्रात साडेअकरा हजार क्युसेसचा जलविसर्ग, गोदाकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा
नाशिक व नगर भागातील पावसाचे पाणी नाथसागर जलाशयात मोठ्या प्रमाणावर दाखल होऊ लागल्याने आज जायकवाडीचे 18 दरवाजे दुसर्यांदा उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीच्या पात्रात तब्बल 11 हजार 528 क्युसेस याप्रमाणे जलविसर्ग झेपावत असून, नदीकाठावरील गावांमध्ये सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
जायकवाडी धरणाचे 12 दरवाजे सकाळी 6 वाजता अर्धा फूट उघडून 6 हजार 788 क्युसेस पाण्याचा विसर्ग प्रारंभी सुरू करण्यात आला होता. दरम्यान, नाथसागर जलाशयात पाण्याची आवक वाढली असल्याने दुपारी दुसर्या टप्प्यात आणखी 6 दरवाजे उघडून 18 दरवाजांद्वारे 9 हजार 432 क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात होता.
या पार्श्वभूमीवर संध्याकाळी 6 वाजता नाथसागर जलाशयात दाखल होणार्या पाण्याची आवक वाढली. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी 10, 18, 19 व 27 क्रमांकाचे दरवाजे अर्ध्या फुटावरून 1 फूट वर केले. उर्वरित 14 दरवाजे अर्धा फूट वर उचललेले आहेत. एकूण 27 पैकी 18 दरवाजे उघडण्यात आले असून, सध्या 11 हजार 528 क्युसेस याप्रमाणे विसर्ग सुरू आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव व दगडी धरण विभागाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पाण्याची चिंता मिटली
जायकवाडी धरणात आता पुरेसा पाणीसाठा असून पिण्याच्या पाण्याची व औद्योगिक पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे. कृषी सिंचनाचा प्रश्नही यंदा सुसह्य होणार आहे, अशी माहिती तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली. 24 ऑगस्ट रोजी धरणात केवळ 2 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. वापरायोग्य पाणीसाठा मृतसाठ्याकडे वाटचाल करत होता. नाथसागराची पाणीस्थिती चिंताजनक बनली असताना नाशिक व नगर भागातील पावसाचे पाणी येण्यास सुरुवात झाली. नंतर पाणलोट क्षेत्रात असलेली 9 धरणे तुडुंब भरली. त्यामुळे वरच्या धरणातून जलविसर्ग केला गेला. 8 सप्टेंबर रोजी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले. 9 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. 5 दिवसांनंतर ते टप्प्याटप्प्याने बंद करून जलविसर्ग थांबवण्यात आला होता. आता दुसर्यांदा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गावातील ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. नदीकाठावर बांधलेल्या पशुधनाला सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहनही तहसीलदार सारंग चव्हाण यांनी केले आहे.
पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने मांजरा धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे. सध्या धरण 100 टक्के भरल्याने दोन दरवाजे उघडून 1730 क्युसेसचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List