मी कोणतीही गोष्ट मिळवण्याकरता नौटंकी केली नाही, भास्कर जाधव यांनी दिले स्पष्टीकरण
मी जी विधान केलीच नाही तरी प्रसारमाध्यमांमध्ये दाखवली जात आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. तसेच मी कोणतीही गोष्ट मिळवण्याकरता नौटंकी, नाटकबाजी केली नाही असेही भास्कर जाधव म्हणाले. भास्कर जाधव यांनी पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आपल्या पत्रात भास्कर जाधव म्हणाले की, गेल्या चार दिवस मी जे वक्तव्य केलं नाही किंवा जी गोष्ट माझ्या मनामध्ये सुद्धा नाही. त्याला प्रसारमाध्यमांमध्ये खूप मोठी प्रसिद्धी देऊन (खास करून इलेक्ट्रॉनिक मीडिया) माझेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे. याबाबत काही ठळक मुद्द्यांबाबत वस्तुस्थिती मी आपल्यासमोर ठेवत आहे. कृपया त्यास प्रसिद्धी देऊन सहकार्य करावे.
मुद्दा क्रमांक 1- मला माझ्या 43 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव आहे आणि अशी संधी केवळ मलाच मिळाली नाही असं नाही तर ती अनेकांना मिळत नसते, असे मी म्हणालो. परंतु मला शिवसेना पक्षाने संधी दिली नाही असं मी बोलल्याचं सातत्याने हायलाईट केला जात आहे. परंतु माझे तसे काही विधान असल्यास ते कधीही आपण प्रसिद्ध करावे.
मुद्दा क्रमांक 2- माजी आमदार राजन साळवी यांनी इतर पक्षांमध्ये जाऊ नये याकरता मी सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे आणि उदयभान यांच्यात झालेल्या लढाईचा दाखला देऊन आपलं राजकीय मरण तर पक्क आहे, मग परतीचे दोर कापले असे समजून लढू प्रसंगी मरण पत्करू आणि जिंकू असा आवाहन मी त्यांना केलं. पण ते अन्य पक्षात गेले तेव्हा ‘राजन साळवी गेले म्हणून रत्नागिरी जिल्हा किंवा कोकण तिकडे गेला नाही, हेही मी बोललो. मात्र यापैकी कोणत्याही मुद्याला ठळक प्रसिद्धी देण्यात आली नाही.
मुद्दा क्रमांक 3- आज कोणीही कुठेही गेला तरी सुद्धा ज्याप्रमाणे विजापूरच्या किल्ल्याभोवती एक मोठा खंदक पाण्याने भरलेला होता किंवा आहे व त्यामध्ये शत्रूचे सैन्य पडून मृत्यू ओढवून घेत होते. मग खंदकात पडून मरण्यापेक्षा आपण सर्वांनी लठू या आणि जिंकूया, त्याकरता इंग्रज स्वतःचे उदाहरण देखील मी दिले तो मुद्दाही दृष्टीआड करण्यात आला आहे
मुद्दा क्रमांक ४- आज जे लोक शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदार आहोत म्हणून सांगतात त्यावर मी एक मार्मिक उदाहरण दिलं. एखाद्याच्या वारस तपास तलाठी व महसूल यंत्रणा करत असते. एका रात्रीत तलाठी मूळ वारसदाराला डावलून तोतया वारसदाराचे नाव सातबारावर वारसदार म्हणून दाखल करतो. आमच्या पक्षाचा देखील असंच झाला आहे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे हेच आहेत. परंतु विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग यांनी खऱ्या वारसदाराला बाजूला सारून शिवसेनाप्रमुखांची शिवसेना, निशाणी, झेंडा हा तोतया वारसदारांचा असल्याचं ठरवलं. या विरोधात आम्ही न्यायालयांमध्ये न्याय मागत आहोत. पण तिथेही तारीख पे तारीख आम्हाला मिळत आहे पण आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत हे सिद्ध करण्याकरता लढत राहू आणि सिद्ध करून दाखवू, हे मी सांगितलं पण त्यालाही कुठे प्रसिद्ध मिळाली नाही
मुद्दा क्रमांक 5- मला विरोधी पक्षनेता पद मिळण्याकरता मी नाराजीचं नाटक करतो आहे हे सातत्याने (इलेक्ट्रॉनिक मीडियावर) दाखवणे हे तर माझ्या 43 वर्षाच्या तत्त्वाने लढणाऱ्या राजकीय सिद्धांतावर प्रचंड असा अन्याय करणार आहे. मी कोणतीही गोष्ट मिळवण्याकरता नौटंकी, नाटकबाजी, रुसणे, रडत राहणे आणि रडून जोगळे भरणे हे माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही केले नाही आणि करणारही नाही. या आपल्या बातमीने (इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या) माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या आहेत. माझा नियतीवर कालही विश्वास होता आजही आहे आणि उद्याही असेल
माझ्या राजकीय कार्यपद्धतीमध्ये माझे दोन दोष आहेत
1- दिलेली वेळ पाळणे दिलेला शब्द पूर्ण करण्याकरता वाटेल ते कसं कष्ट उपसणे त्यासाठी प्रसंगी कोणाशी संघर्ष करणे
2 – कोणाला बरं वाटेल यापेक्षा खरं काय आहे हे मांडण्याचे धाडस माझ्यामध्ये आहे आणि म्हणून माझं संपूर्ण राजकीय जीवन हे मी तत्वांना जगलो आहे.
आता माझ्या उत्तरार्धाच्या राजकीय कारकीर्दीमध्ये मी माझ्या तत्त्वांना मूठ माती दद्यावी असं मला अजिबात वाटत नाही आणि हा माझा राजकीय दोष बरोबर बाळगूनच पुढचा आयुष्य जगण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. कृपया सदर वस्तू स्थितीला योग्य ती प्रसिद्धी देऊन सहकार्य करावे ही विनंती असेही भास्कर जाधव म्हणाले.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List