सरकारच्या अव्यवस्थेमुळे चेंगराचेंगरी; ‘महाकुंभ’चा वापर राजकीय प्रचारासाठी, संजय राऊत यांनी मोदी सरकारलं फटकारलं
दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री चेंगराचेंगरी होऊन महाकुंभ मेळ्याला निघालेल्या 18 भाविकांचा मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. याआधी महाकुंभ मेळ्यातही चेंगराचेंगरी होऊन 30 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला होता. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला फटकारले आहे. महाकुंभचा वापर भाजपने राजकीय प्रचारासाठी केला आहे. लोकांना आमंत्रित केले, मात्र अव्यवस्थेमुळे चेंगराचेंगरी झाली, असा घणाघात राऊत यांनी केला. तसेच सरकार खरा आकडा लपवत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.
महाकुंभच्या निमित्ताने सरकारने जी अव्यवस्था दाखवली त्याचे बळी दिल्ली रेल्वे स्थानकावर गेले. सरकारी आकडा 18 असला तरी किमान 120 ते 150 लोक चेंगराचेंगरीत मरण पावलेली आहेत. सरकार आकडे लपवत आहे, असा आरोप करत राऊत म्हणाले की, महाकुंभला जाण्यासाठी भाजपकडून निमंत्रण दिले जात आहे, जणून काही भाजपचाच सोहळआ आहे. लोकांना भ्रमित केले जात आहे की, तुम्ही फक्त या, तुमच्या गाड्या-घोड्याची, जेवणाची, राहणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पण तसे काहीही नसून इतकी अव्यवस्था कोणत्याच कुंभमध्ये झाली नव्हती.
योगी आदित्यनाथ म्हणतात की, 50 कोटी लोक आले, पण चेंगराचेंगरीत किती मेले ते सांगा. प्रयागराजला 7 हजारांहूीन अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. हे लोक कुठे गेले. ते एक करत चेंगराचेंगरीत मरण पावले किंवा अन्य कारणाने मरण पावले. आज दिल्लीतही चेंगराचेंगरी झाली आणि 100 हून अधिक लोक मरण पावले. पण सरकार पहिल्यापासून आकडा दाबत आहे. रेल्वेमंत्री आकडा सांगायला तयार नव्हते. दिल्लीतील रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्याच्या तोंडातून अचानक खरा आकडा बाहेर पडला आणि सत्य समोर आले, असेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, महाकुंभचा राजकीय व्यापार चालवला आहे. मार्केटिंग करून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. सरकारला थोडीही माणुसकी नाही. दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी उसळल्याचे आपण गेल्या काही दिवसांपासून पाहत आहोत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधून लोंढेच्या लोंढे निघालेले आहेत आणि सरकारचे त्याच्यावर नियंत्रण नाही. लोक रेल्वेच्या खिडकीच्या काचा फोडून आत घुसण्याचा प्रयत्न करताना आपण पाहिले असेल. लोक आत दरवाजे तोडून जाताहेत एवढी गर्दी अनावर झाली आहे. सरकार काय करतंय? असा सवाल राऊत यांनी केला.
महाकुंभ हे पवित्र पर्व आहे. श्रद्धेचा सागर आहे. तिथे लाखोंच्या, कोट्यवधींच्या संख्येने लोक येणार. पण याचा वापर राजकीय प्रचारासाठी होत आहे. यामुळेच चेंगराचेंगरीसारख्या घटना होत आहे. सरकारने 50 कोटी लोकांना बोलावले, पण त्यांची काय व्यवस्था केली? असा सवाल राऊत यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List