सिनेटचा विजय ही तर सुरुवात, विधानसभेला…; आदित्य ठाकरे काय म्हणाले?
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक काल अखेर पार पडली. या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा शिवसेना ठाकरे गटाने जिंकल्या. सिनेट निवडणूक ठाकरे गटाने एक हाती जिंकली. त्यानंतर आता आज ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसैनिक जमले आहेत. शिवसैनिक मातोश्री बंगल्याबाहेर जल्लोष करत आहेत. युवा सेनेच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जातोय. एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला जात आहे. आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांना खांद्यावर घेऊन जल्लोष करण्यात आला. गुलालाची उधळण केली जात आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केलं. हा ‘दस का दम’ आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
जय महाराष्ट्र, सर्वांचं अभिनंदन करतो. विजय काय असतो हे काल दाखवून दिलं आहे. करून दाखवलं आहे. ही सुरुवात आहे. असाच विजय विधानसभेत मिळवायचा आहे. सर्वात पहिला सन्मान राजन कोळंबकर यांचा करायचा आहे. राजन यांनी निष्ठा काय असते हे दाखवून दिलं आहे. मागच्या दोन्ही टर्ममध्ये ते सिनेट सदस्य होते.यावेळी त्यांना सांगितलं तुम्हाला थांबावं लागेल. काही चेहरे बदलायचे आहेत. नवीन नावं द्यायचं आहे. ते म्हणाले, तुम्ही कुणालाही उमेदवारी द्या. मी दहाच्या दहा लोकांना निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
ही तर सुरुवात…- आदित्य ठाकरे
आजपासूनची विजयाची सुरुवात आहे. गुलाल उधळला आहे. हाच गुलाल विधानसभेच्या निवडणुकीला उधळायचा आहे. त्यासाठी कामाला लागा. आपल्यावर जनतेने जो विश्वास दाखवला आहे. तोच विश्वास उद्धव ठाकरेंवर जनता विश्वास दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासाठी काम करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
वरुण सरदेसाई यांचंही आदित्य ठाकरेंनी कौतुक केलं. वरुणचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सर्व गणितं वरुण मांडत असतो. मी परवा चिडवत होतो की वरूण स्थगिती येईल बघ. आपल्या सर्व टीमने प्रचंड मेहनत घेतली. आपण दोन वर्षापासून काम करत आहोत. आपण विभागप्रमुखांपासून सर्वांना फोन करून पदवीधरांची नोंदणी करून घ्यायला सांगितलं होतं. हे ४० गद्दार होते, तेवढी नोंदणी झाली नाही ती यावेळी झाली. मिंधे सरकारने नोंदणी रद्द केली. ती त्यांनी १३ हजारांवर आणली. आपल्याला ९० टक्क्याहून अधिक मते मिळवली. हा पदवीधरांचा विश्वास एकाच नावावर आहे. ते म्हणजे उद्धव ठाकरे, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List