प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत असते तर भाजप नेस्तनाबूत झाला असता – संजय राऊत
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवासेनेच्या उमेदवारांनी 10 पैकी 10 जागा जिंकत दणदणीत विजय संपादन केला. अभाविपच्या उमेदवारांना हरवत युवासेनेचे सर्व उमेदवार विजयी झाले. या विजयानंतर शिवसेवा उद्धव ठाकरे गट आणि युवासेनेने आनंदोत्सव साजरा केला. या विजयाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सिनेट निवडणुकीत युवासेनेला निर्भेळ यश मिळालं. अथक प्रयत्न करूनही अभाविप, मिंधे गाटाला ही निवडमूक टाळता आली नाही कारण इथला मतदार विकला जात नाही, त्यामुळे मिंधे गटाचं काहीच चाललं नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारलं.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी भाजपने, मिंधे गटाने गेली दोन वर्षं निवडणूक रखडवण्याचा,निवडणूक टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मतदार यादीच रद्द करायची असे अनेक उपदव्याप केले. दोन वर्षांत निवडणूक घेणं टाळण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. शेवटी हायकोर्टाने दणका दिल्यावर सिनेटच्या निवडणुका झाल्या आणि काल निकाल लागला. 10 पैकी 10 जागा जिंकून मुंबईचा तरूण वर्ग, सुशिक्षित पदवीधर वर्ग हा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे, शिवसेनेच्या मागे उभा असल्याचं दिसून आलं, असं राऊत यांनी नमूद केलं.
याआधी पदवीधर मतदारसंघातही शिवसेनेचा विजय झाला, आता सिनेट निवडणुकांमध्येही युवासेनेला विजय मिळाला. 10 पैकी 9 उमेदवारांनी कोटा तोडून मतं मिळवली.तर शेवटच्या दहाव्या उमेदवाराला 865 मतं मिळवली. पण बाजपच्या अभाविपच्या सर्व उमेदवारांना मिळून फक्त 706 मतं आहेत. आमच्या शेवटच्या उमेदवारालाही त्यांच्यापेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. मुंबई विद्यापीठावर आता भगवा फडकला आहे. अभाविप असो किंवा मिंधे गट सेल, त्यांना प्रयत्न करूनही ही निवडणूक टाळता आली नाही, कारण येथील मत विकत घेता नाहीत, मतदार विकला जात नाही. त्यामुळे मिंध्याचं काहीच चाललं नाही,असं ते म्हणाले.
मुंबई विद्यापीठाने निवडणुकीला दोन दिवस असताना त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं होतं. यावेळी कोर्टाने निवडणुका घ्याव्याच लागतील असे आदेश दिले होते. त्यासाठी प्रशासनाला दोन दिवस वाढवून देण्यात आले होते. युवासेनेचा विजय होईल अशा भीतीनेच सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक पुढे ढकलली होती, असा आरोप मविआच्या नेत्यांनी केला होता.
मविआत कोणतीही भांडणं नाहीत, संजय राऊतांचे आंबेडकरांना प्रत्युत्तर
महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला 44 जागा मिळतील. काँग्रेस 150 तर पवार गट 88 जागांची मागणी करणार असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. मात्र महाविकास आघाडीमध्ये कोणतीही भांडणं नाही, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी आंबेडकरांना दिलं.
‘ आमच्यामध्ये काहीही भांडणं नाही, भांडण व्हायची सुतराम शक्यताही नाही. बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेचे निकाल पाहिले असते तर आमची वज्रमूठ त्यांनी पाहिली असती. आमची वज्रमूठ मजबूत होती, म्हणून आम्ही महाराष्ट्रात नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो. जर बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष 100 टक्के नेस्तनाबूत झाला असता’ असेही राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List