मुख्यमंत्रीसाहेब, मराठवाड्याच्या हक्काचे 46 हजार कोटी कुठे गेले? मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त जाहीर पॅकेजचा निधी लाडकी बहीण योजनेत वळवला
गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करून मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाड्याला तब्बल 46 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यासाठी अख्खे मंत्रिमंडळ मराठवाड्यात आले होते. घोषणा करून मिंधे सरकार पळून गेले. वर्षभर सरकारने मराठवाड्याला तोंड दाखवले नाही. 46 हजार कोटींमधले 46 पैसेही मराठवाड्याच्या वाट्याला अद्याप आले नाहीत. मग हा सगळा पैसा गेला कुठे? मराठवाड्याच्या हक्काचा हा पैसा मिंधे सरकारने निलाजरेपणाने लाडकी बहीण योजनेत वळवला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
निजाम, रझाकाराच्या अत्याचाराविरोधात लढा देऊन मराठवाड्याने स्वातंत्र्य मिळवले. त्यासाठी अनेकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मराठवाडा महाराष्ट्रात बिनशर्त सामील झाला. नागपूर करारानुसार उपराजधानी नागपुरात हिवाळी अधिवेशन तर मराठवाड्यात वर्षातून एकदा मंत्रिमंडळ बैठक घेण्याचे निश्चित झाले. मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गेल्या वर्षी झाडून सारे मंत्रिमंडळ मराठवाड्यात आले. छत्रपती संभाजीनगरात जंगी बैठक झाली. पत्रकार परिषदेत छाती फुगवून 46 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले.
वाट पाहून डोळे शिणले
वेगवेगळ्या विकास योजनांसाठी मिंधे सरकारने 46 हजार कोटी रुपयांचे जाहीर केलेले पॅकेज पाहून मराठवाडा हरखून गेला. विकासाची गंगा मराठवाड्याच्या दारी आली असे चित्र निर्माण झाले. परंतु हे गाजर होते, हा जुमला होता हे वर्षअखेरीस समोर आले. जाहीर करण्यात आलेल्या 46 हजार कोटींपैकी साधे 46 पैसेही हे सरकार देऊ शकले नाही. अर्थसंकल्प जाहीर करण्याअगोदर मराठवाड्याला देऊ करण्यात आलेल्या पॅकेजच्या संदर्भात थोडीफार हालचाल झाली. पण पैसा काही आला नाही.
लाडकी बहीण योजनेत पॅकेज वळवले
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मिंधे सरकारने शेवटच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आणली. राज्यातील दोन कोटी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये टाकण्यात येणार असल्याची घोषणा झाली. त्यासाठी लागणार्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ही तरतूद कोणत्या मार्गाने करण्यात आली हे मात्र त्यांनी गुपित ठेवले. लाडकी बहीण योजनेसाठी िंमधे सरकारने मराठवाड्याला जाहीर करण्यात आलेल्या 46 हजार कोटींचा निधी परस्पर वळवला. त्यासाठी अनेक योजनांना कात्री लावण्यात आली. अनेक योजना गुंडाळण्यात आल्या. अनेक विभागांना विकास योजनांसाठी देण्यात येणारा निधी थांबवण्याची फर्माने सुटली. एवढेच काय शेतकर्यांच्या वारसांना देण्यात येणारी मदतही वर्षभर थांबवण्याचे तुघलकी फर्मान या सरकारने काढले. आता हा पैसा कधी मिळणार, मिळणार की नाही याचे उत्तर द्यायला सरकार तयार नाही.
मुक्तिसंग्रामाचाही घोर अपमान
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मिंधे सरकारने मोठ्या बाजारगप्पा मारल्या. देशाची राजधानी दिल्लीत मुक्तिसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा उभारण्याची घोषणा सरकारने केली. मुक्तिसंग्रामाचे भव्य स्मारक उभारण्यासाठी 100 कोटी देण्यात आले. महिला स्वातंत्र्यसैनिक दगडाबाई शेळके यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याचबरोबर मुक्तिसंग्रामाशी निगडीत अनेक योजनांसाठीही मुबलक पैसा देणार असल्याची थाप मिंधे सरकारने मारली. मात्र वर्षभरात एकही पैसा हे सरकार देऊ शकले नाही. थापेबाज सरकारने मुक्तिसंग्रामाचाही घोर अपमान केला.
- मिंधे सरकारने मारलेल्या थापा
- – राजधानी दिल्लीत स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा
- पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोर्यात वळवणार त्यावर 14 हजार कोटींचा खर्च
पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी 105 कोटी
वैजापूरच्या शनीदेवगावला 285 कोटी खर्चुन बंधारा
वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरासाठी 156 कोटी
तुळजाभवानी मंदिरासाठी 1328 कोटी
औंढा नागनाथ मंदिरासाठी 60.35 कोटी
सिल्लोड तालुक्यातील मुर्डेश्वर देवस्थानसाठी 45 कोटी
पाथरी येथे साईबाबा तीर्थक्षेत्र विकासासाठी 91 कोटी
मानव विकास अंतर्गत बसेससाठी 38 कोटी
अंगणवाडी विकासासाठी 386 कोटी
दगडाबाई शेळके स्मारकासाठी 5 कोटी
उसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी कस्तुरबा गांधी विद्यालय
निजामकालीन शाळांच्या दुरूस्तीसाठी 200 कोटी
परभणी क्रीडा संकुलासाठी 15 कोटी
छत्रपती संभाजीनगरात क्रीडा विद्यापीठासाठी 653 कोटी
परळीत क्रीडा संकुलासाठी 5 कोटी
जळकोट क्रीडा संकुलासाठी 5 कोटी
मराठवाड्यात दुधाळ जनावर वाटपासाठी 3225 कोटी
छत्रपती संभाजीनगर, फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी प्रत्येक 50 कोटी
उदगीर हत्तीबेट विकासासाठी 5 कोटी
अंबड मत्स्योदरी देवी संस्थानसाठी 40 कोटी
मराठवाड्यातील मंदिरे, स्मारकांसाठी 253 कोटी
बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीसाठी 63 कोटी
वसमत पूर नियंत्रणासाठी 33 कोटी
आपत्ती व्यवस्थापनासाठी 55 कोटी
धारूर तालुक्यातील सुकळीचे पुनर्वसन
आष्टी एमआयडीसीसाठी 38 कोटी
मराठवाड्यातील रस्त्यांसाठी 12400 काेटी
नांदेड गोदावरी घाट सौंदर्यीकरणासाठी 100 कोटी
मातोळा, कल्हाळी येथे हुतात्मा स्मारक
हिप्परगा येथे बहुउद्देशिय इमारत
लातुर-बार्शी-टेंभूर्णी चार पदरी मार्ग
75 ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय
बीड जि.प. इमारतीसाठी 35 कोटी
नांदेड शहर सीसीटीव्हीसाठी 100 कोटी
बीड, परळी, अंबाजोगाई पोलीस हाऊसिंगसाठी 300 कोटी
छत्रपती संभाजीनगरातील क्रांतीचौक पोलीस ठाणे, मिलकॉर्नर येथील निवासस्थानांसाठी 191 कोटी
बसस्थानकांमध्ये अमुलाग्र सुधारणा
छत्रपती संभाजीनगरात ई-बसेससाठी 421 कोटी
छत्रपती संभाजीनगर वाहन निरीक्षण, परीक्षण केंद्रासाठी 135 कोटी
विविध शहरात मुलभूत विकासासाठी 640 कोटी
छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा 2740 कोटी
नांदेड मल:निस्सारण प्रकल्पासाठी 329 कोटी
परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास 286 कोटी
ग्रामपंचायत नेटजोडणीसाठी 286 कोटी
छत्रपती संभाजीनगर, नांदेड विद्यापीठात मुक्तिसंग्राम संग्रहालय
मराठवाड्यात 4 लाख विहीरी
बीड येथे सीताफळ प्रक्रिया उद्योग
हिंगोली हळद संशोधन केंद्रासाठी 100 कोटी
अंबाजोगाई कृषी महाविद्यालयात वसतिगृहासाठी 105 कोटी
अहमदपुरात मानार नदीवर नऊ कोल्हापुरी बंधारे
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर शिष्यवृत्ती
मदरसा आधुनिकीकरणासाठी अनुदानात वाढ
वेरूळ येथे छत्रपती शहाजी राजे भोसले स्मारक
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List