‘बॉम्बेचं मुंबई करण्यात माझं योगदान आहे’, म्हणणाऱ्या अमित शहांना संजय राऊत यांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
बॉम्बेचे मुंबई करण्यामध्ये माझे योगदान आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले. याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून आम्ही काय गोट्या खेळत होतो का? असा सवाल केला. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बॉम्बेचे मुंबई व्हायलाच पाहिजे, पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजे म्हणून 50 वर्ष आंदोलन केले. आमच्या इतर काही पक्षातील सहाकऱ्यांनी हा विषय कोर्टात नेला. अनेक जण या लढाईत होते. आता तुम्ही मुंबईला येता आणि बॉम्बेचे मुंबई मी केले म्हणून सांगतात. लोकं काय विश्वास ठेवणार, असेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई निर्माण झाली. ते हुतात्मे मराठी होते. जेव्हा जेव्हा मुंबईवर अशा प्रकारचा हल्ला होईल तेव्हा असंख्य हुतात्मे देण्याची क्षमता महाराष्ट्रात आणि असली शिवसेनेमध्ये आहे. तुमच्या बगलेतल्या ढोंगी शिवसेनेमध्ये नाही. ते लाचार आहेत. आमच्या शिवसेनेमध्ये अजूनही मुंबई आणि मराठी माणसासाठी बलिदान देण्याची तयारी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही राऊत यांनी दिला.
लालबागचा राजाही गुजरातला नेईल या विधानावरून गदारोळ करणाऱ्या भाजपलाही संजय राऊत यांनी फटकारले. माझं विधान काय होते. आम्हाला भीती वाटते. गुजरातचे व्यापारी मंडळ, भाजप महाराष्ट्राच्या राजधानीवर सातत्याने हल्ले करतेय. मुंबई ओरबाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईतल्या सगळ्या उत्तम आणि चांगल्या गोष्टी गुजराती व्यापार मंडळाच्या फायद्यासाठी गुजरातला न्यायचा प्रयत्न सुरू आहे. मग उद्योग, व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र असो. यासाठीच त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसही तोडली. त्यामुळे आम्हाला भीती वाटते की जे वैभवाचे, प्रतिष्ठेचे आहे ते सगळे ओरबाडून तर नेणार नाही ना, असे राऊत म्हणाले.
काल देशाचे गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले तेव्हा आम्हाला भीती वाटली की पुढच्या वर्षी लालबागच्या राजाला अहमदाबादला तर घेऊन जाणार नाही ना. याआधीही अमित शहा अनेकदा मुंबईत आले पण तेव्हा आम्ही प्रश्न निर्माण केला नव्हता. पण आता भय वाढले आहे. कारण सत्तेच्या बळावर ते काहीही उचलून नेऊ शकतात.
आम्ही लालबागच्या राजाचे भक्त आहोत. आमची श्रद्धा आहे. या श्रद्धेसंदर्भात आमच्या मनात शंका आल्या. ही सगळी जी झुंड आलेली आहे ती लालबागच्या राजासंदर्भात वेगळा निर्णय तर घेणार नाही ना. लालबागचा राजा मुंबईची शान आणि प्रतिष्ठा आहे. लाखो श्रद्धाळू तिकडे येतात. हे भाग्य मुंबईतल्या दैवतांना मिळते. त्यामुळे कुणाच्या पोटात दुखत असेल. त्याच्यामुळे देवच पळवण्यासारखे काहीही होऊ शकते, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, विधानसभेला अजित पवार यांचा बारामतीत पराभव होणार हे पक्के आहे. अजित पवारांनी घर तोडले, पक्ष फोडला. वडिलांसारख्या शरद पवारांनी त्यांना सर्वकाही दिले. पण त्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. त्यामुळे आता पश्चाताप होऊन काही फायदा नाही, असेही राऊत म्हणाले. तसेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे नेते आता अमित शहा आहेत. अमित शहा किंवा अन्य व्यापारी मंडळ इथे आल्यावर महाराष्ट्रातले दौरे सोडून त्यांच्या चरणाशी यावेच लागते, असा टोलाही त्यांनी लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List