ही खूप दुर्दैवी गोष्ट; केजरीवालांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जामीनावर तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यांनी दोन दिवसात राजीनामा देण्याची घोषणा रविवारी केली आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत केजरीवाल यांचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. यात तपास यंत्रणांचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे सांगत त्यांनी मोदी सरकारला झोडून काढले.
अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. या प्रकरणात तपास यंत्रणांचा गैरवापर झाला आहे. आयकर विभाग, सीबीआय आणि ईडीचा गैरवापर होतो, हे सातत्याने आम्ही सांगतो. केजरीवाल हे देशाचे मोठे नेते आहेत. हा विषय संविधानासाठी खूप महत्त्वाचा होता. चुकीच्या पद्धतीने त्यांना अटक झाली. एकतर या तपास यंत्रणांची भीती दाखवायची नाहीतर वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे, असे भाजपचे राजकारण सुरू असल्याचा हल्लाबोल सुळे यांनी केला.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षातील एका नेत्याने पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, असे वक्तव्य केले होते. त्याबाबतही सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्या नेत्याची देशाला गरज आहे. ते जर पंतप्रधान झाले, तर आम्हाला आनंदच होईल. एक मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर बसेल. नितीन गडकरी गलिच्छ राजकारण करत नाहीत. सत्तेसाठी त्यांनी कधी आपली भूमिका बदलली नाही. विकासात ते कधीच राजकारण करत नाहीत, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List