सरकारचा वेग गोगलगायीचा, फाईल पुढे जाण्यासाठी धक्का मारावा लागतो; फडणवीसांची कबुली, सुप्रिया सुळेंची कोपरखळी
मिंधे सरकारमध्ये राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा फज्जा उडालेला असतानाच सरकारी बाबुंमध्ये कामाप्रती अनास्था असल्याचे दिसून येत आहे. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याची कबुली दिली आहे. आमच्या सरकारमध्ये फाईलला गोगलगायीच्या पावलाने पुढे सरकते. फाईल पुढे जाण्यासाठी धक्का मारावा लागतो, असे फडणवीस म्हणाले. याचा दाखला देत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.
सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सकाळी एक ट्विट केले. यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा आधार घेत सरकावर जोरदार टीका केली. चला बरं झालं, स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनीच सांगून टाकलं की त्यांच्या सरकारचा वेग गोगलगायीचा आहे. या सरकारमध्ये फाईल पुढे जाण्यासाठी धक्का मारावा लागतो असंही त्यांनी कबूल केलेय. थोडक्यात महायुतीच्या काळात प्रशासन गतीमान वगैरे सांगणाऱ्या जाहिराती साफ खोट्या आहेत याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय? असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले.
पुढे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले द्रष्टेपणाने म्हणालेच होते – ‘विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।’
खोकेबाजीच्या अविद्येचे एवढे सगळे प्रताप झाले. या खोकेबाजीमुळे या सरकारची मती गेली, मती गेली म्हणून नीती गेली, नीती गेली म्हणून गती गेली, गती गेली म्हणून उद्योग परराज्यात जाऊ लागले म्हणजेच वित्त गेले. वित्त नाही म्हणून शेतकरी, गोरगरीब, शोषित, वंचितांच्या हक्काचं हे सरकार देऊ शकत नाही. तात्पर्य काय तर महायुतीचे हे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारचे वाभाडा काढले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List