आम्ही राजकारण करू नये, असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा; उपोषणापूर्वी जरांगेचा सरकारला इशारा
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत. उपोषणापुर्वी त्यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारला इशारा दिला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षणासाठी मी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करत आहे. मराठा समाजाने राज्य सरकारला आणखी एक संधी दिली आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. आम्हाला या आंदोलनातून कोणतेही राजकारण करायचे नाही. आम्ही राजकारण करू नये, असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा. मागच्या उपोषणापर्यंत सरकार आमची दखल घेत होतं. आता तुम्ही या अगर येऊ नका, आपण आपली प्रक्रिया राबवत असतो. कोणी आले म्हणून आंदोलन होत नसते. पण राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
आजपासून मी राजकीय विषयावर बोलणार नाही. निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. त्यामुळे राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही. राज्य सरकारने आमच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी, नंतर बोंबलू नये. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील काही माकडांना सांगावे की, जरांगे पाटील हा फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसला आहे. निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List