शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती, 400 पारच्या नाऱ्याची लोकांमध्ये भीती… छगन भुजबळ यांच्या रोखठोक विधानाने महायुतीला धडकी?
Lok Sabha Election 2024 : अजित पवार गटाचे नेते, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुकीच्या धामधुमीत केलेल्या एक विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती आहे, असे मोठे विधान त्यांनी केले. एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत भुजबळ यांनी NDA ला विजयाचा मार्ग सुकर नसल्याचे म्हटले आहे. त्याचा फायदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना होईल, असे ते म्हणाले. जनतेत NDA च्या 400 पार नाऱ्याविषयी पण भीती आहे. जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भरवसा आहे. त्यांचेच सरकार पुन्हा एकदा सत्तेत यावे अशी लोकांची इच्छा असल्याचे ते म्हणाले.
नाशिकच्या जागेविषयी काय भूमिका?
नाशिक लोकसभा जागेविषयी भुजबळ यांनी त्यांचे स्पष्ट मत मांडले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नाशिक मतदारसंघावरील दावा सोडला का? असा सवाल त्यांना करण्यात आला. तेव्हा मी असं नाही म्हणू शकत. याविषयीची माहिती माझे वरिष्ठ देतील, असे उत्तर त्यांनी दिले. होळीच्या दिवशी मला सांगण्यात आले की नाशिकची जागा तुम्ही लढवा. मी ही जागा मागितली नव्हती. पण जेव्हा मला सांगण्यात आले की जागा लढवा, तेव्हा मी याविषयी विचार केला. 2009 मध्ये माझा पुतण्या समीर भुजबळ येथून खासदार होता. त्यानंतर हेमंत गोडसे दोनदा निवडून गेले.
उमेदवारी जाहीर करण्यात खूप वेळ
मी वरिष्ठांन सांगितले की त्याच लोकांना ही जागा लढवू द्या. पण मला सांगण्यात आले की तुम्हीच नाशिकची जागा लढवा. त्यानंतर मी लोकांशी चर्चा सुरु केली. मी उमेदवारी जाहीर होण्यासाठी बऱ्याच काळापासून प्रतिक्षेत राहिलो. तीन ते चार आठवडे संपल्यानंतर मला वाटलं आता वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. मी सन्मानाने लढू इच्छितो. मी पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तिकीट मागितले. त्यानंतर मी उमेदवारी कधी आयुष्यात मागितली नाही. उमेदवारी जाहीर होण्यात उशीर झाल्याने मी दुखी आहे. यानंतर मी निश्चय केला की, मला आता लढायचे नाही.
400 पारच्या नाऱ्याने भीती
- इंडिया आघाडीने म्हटले आहे की, जर NDA ला बहुमत मिळाले तर घटना, संविधान धोक्यात येईल, यावर भुजबळांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. उत्तरात भुजबळ म्हणाले, हो, याविषयी भीती तर लोकांमध्ये आहेच. लोकांना वाटते की, संविधान, घटना बदलण्यासाठी 400 पारचा नारा देण्यात आला आहे.
- भुजबळ यांनी काही उदाहरणं पण दिली. कर्नाटकातील भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे यांचे संविधान बदलण्याचे विधानाचा दाखला त्यांनी दिला. राजस्थानमधील नागोर येथील भाजपचे उमेदवार ज्योती मिर्धा यांनी पण घटना बदलण्याची भाषा वापरली. त्यामुळे जनतेच्या मनात 400 पारच्या नाऱ्याने भीती आहे. भुजबळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संविधान मजबूत असल्याच्या विधानाकडे पण लक्ष वेधले. पण या नाऱ्याचा परिणाम निकालानंतरच समोर येईल, असे भुजबळ म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List