मोदी म्हणजे रद्द झालेली नोट, बावनकुळे म्हणजे कालबाह्य झालेला ढब्बूपैसा; संजय राऊत यांचा टोला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मराठवाड्यात चारही जागांवर शिवसेनेचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच आता जनता मोदी यांच्या मुखवट्याला कंटाळली आहे. हा चेहरा देशासाठी भयावह आहे. त्यामुळे आता मोदी यांना पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्यांच्या प्रचारसभेतून पराभूत मनोवृत्ती दिसत आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.
शिवसेनेचे मराठवाड्यातील चारही उमेदवार मताधिक्याने विजयी होत आहेत. संभाजीनगरमध्ये विरोधकांनी कोणताही उमेदवार दिला तरी विजय आमचाच होणार आहे. यंदा जालना आणि लातूरमध्ये परिवर्तन दिसणार आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही. तसेच नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या धडकेने आदर्श टॉवर कोसळणार आहे, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 पेक्षा जास्त जागा मिळतील, हा निकाल बदलण्याची ताकद कोणाचीही नाही. अदृश्य शक्ती किंवा महाशक्तीदेखील हा निकाल बदलू शकणार नाही, आता जनता आमच्यासोबत आहे, असे त्यांनी ठणावून सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, यासाठी आम्ही प्रयत्न केले,विनवण्या केल्या. संविधान रक्षण आणि लोकशाही रक्षणासाठी त्यांनी आमच्यासोबत यावे, ही आमची भूमिका होती. त्यांना आम्ही सहा जागांचा प्रस्ताव दिला होता. आता त्यांनी त्यांचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र, आम्ही त्यांचा आदर करतो. देश संकटात असताना एकत्र येण्याची गरज आहे, तसेच इतिहासात या गोष्टींची नोंद होत असते, असेही त्यांनी सांगितले. आम्ही 20 जागा फिक्स केल्या आहेत, म्हणजे 20 जागांवर भाजपचा निश्चित पराभव होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदींचे नाणे गेल्या 10 वर्षात घासून पुसून गुळगुळीत झाले आहे. मोदींना नोचबंदी जाहीर करत 2 हजार रुपयांची नोट रद्द केली. ती रद्द केलेली नोट म्हणजे मोदी. ती आता चालत नाही. तसेच चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे कालबाह्य झालेला ढब्बूपैसा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. आता ढब्बूपैशाला वाटत असेल आपले नाणे खणखणीत वाजत आहे, तर त्यांनी त्यांचे कान तपासून घ्यावे, असेही ते म्हणाले.
पराभूत मनोवृत्तीतून नरेंद्र मोदी प्रचारसभेतून बोलत आहेत. इंडिया आघाडीचे लोक मुघत प्रवृत्तीचे आहेत, असे मोदी म्हणाले. इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटन खातात, हा प्रचाराचा मुद्दा कसा होऊ शकतो. कोण मटन, चिकन, मासे खातंय, इकत्या खालच्या स्तरावर पंतप्रधान प्रचाराची पातळी आणत असतील, तर त्यांना पराभवाची भीती वाटत आहे, हे स्पष्ट दिसते, असेही संजय राऊत म्हणाले. त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नाहीत. विरोधकांच्या मटन, चिकन खाण्याबाबत मोदी बोलतात. मात्र, गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून त्यांनी साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी घेतला आहे, यावर स्वतःला हिंदुत्त्ववादी पक्ष म्हणणाऱ्या मोदी यांनी बोलावे. भ्रष्टाचाराचे शेण खाण्यापेक्षा मटन खाणे चांगले, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
मिंधे गटातील कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय भाजपवाले घेत आहेत. त्यामुळे स्वतःला खरी शिवसेना म्हणवणाऱ्या मिंधे गटाची लायकी भाजपवाले त्यांना दाखवत आहेत. अमोल किर्तीकर बहुमताने विजयी होतील, असा आम्हाला विश्वास आहे. मोदी यांनी मराठवाड्यातील पाणी टंचाईबाबत बोलावे, तसेच मोदी यांचा चेहरा आहे की मुखवटा आहे, हे येणारा काळच ठरवेल, असेही ते म्हणाले. हा चेहरा देशासाठी भयावह आहे. लोकांना आता हा चेहरा नको, आहे, जनता या चेहऱ्याला कंटाळली आहे. टोणग्यांना टोमणेच मारावे लागतात, असेही त्यांनी भाजपला फटकावले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List