रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द, विजय वडेट्टीवार यांची पहिली प्रतिक्रिया
काँग्रेसच्या रामटेक मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केले आहे. रश्मी बर्वे यांनी बुधवारीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही कारवाई झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपला पराभवाची भीती त्यामुळेच विजयी होणाऱ्या काँग्रेस उमेदवाराचा आतापासून छळ सुरू आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे या निवडणुकीत पारडे जड आहे. त्यामुळेच त्यांच्या विरोधात साम दाम दंड भेद सूत्राचा वापर भाजपने सुरू केला आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
ते पुढे म्हणाले, लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या देशाच्या लोकसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणांचे निःपक्ष वागणे अपेक्षित असताना यंत्रणा याविरुद्ध आचरण करत आहे. त्यामुळेच रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र समितीने रद्द केले आहे. लोकशाही मार्गाने, जनतेच्या दरबारात जाऊन निवडणूक लढणाऱ्या रश्मी बर्वे यांच्यावर आज अन्याय झाला आहे.
कायद्यानुसार 17 फेब्रुवारी 2020 ला रश्मी बर्वे यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले होते, त्यामुळे जात पडताळणी समितीला हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नाही. समितीने अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन हा निकाल दिला आहे, त्यामुळे या समिती वर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. जी समिती जात प्रमाणपत्र देते ती समिती जात वैधता प्रमाणपत्र रद्द करू शकत नाही. जात प्रमाणपत्राबाबत समितीने 20 मार्च रोजी नोटीस दिली आणि आठ दिवसात हे प्रमाणपत्र रद्द केले, असेही वडेट्टीवार म्हणाले.
न्यायालयात दाद मागणार
दरम्यान, नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केले होते, सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित राहून पाच वर्ष खासदारकी पदावर राहिल्या, आणि आता भाजपने उमेदवारी दिली. इतकं झालं तरी काँग्रेस लढत राहणार, न्यायालयात आम्ही दाद मागणार असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, तात्काळ कारवाई करावी!
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List