कोण आहेत राजन साळवी ? शिवसेनेचे लागोपाठ तीन वेळचे आमदार, पराभवाने ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेले
शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या राजापूर येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. राजन साळवी हे पराभूत झाल्याने पक्षनेतृत्वाविराधात नाराज झाले होते. त्यांनी मातोश्रीवरील बैठकीत आपल्या पराभवाला थेट शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनाच जबाबदार धरले होते. परंतू उद्धव ठाकरे यांनी तुम्ही म्हणताय म्हणून आणखी कोणाकोणाला काढायचे अशा आशयाचे वक्तव्य करीत त्यांच्यावर उलटा प्रश्न केला होता. त्यामुळे अखेर नाराज होत त्यांनी आणि भाजपात जायचा प्रयत्न केला. परंतू तेथून प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी सायंकाळी अखेर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मान्यता देत त्यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राजापूरचे तीन वेळा आमदार झालेल्या राजन साळवी यांचा यंदा विधानसभेला पराभव झाला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केला.त्यामुळे बुधवारी त्यांनी ठाकरे यांच्याकडे उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. राजन साळवी यांनी ठाणे येथील आनंदमठात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
कोण आहेत राजन साळवी ?
राजन साळवी हे कोकणातील अस्सल मातीतील नेतृत्व असून शिवसेनेशी त्यांची नाळ १९९३-९४ च्या दरम्यान जुळली होती. रत्नागिरीच्या नगर परिषदेच्या इतिहासात ते पहिल्यांदा शिवसेनेचे महापौर बनले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत अनेक पदे भूषवली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीवार्द आणि तत्कालिन शिवसेना नेते नारायण राणे यांच्या पाठींब्याने ते रत्नागिरी जिल्हाप्रमुख देखील झाले. रत्नागिरी जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी झाली.
भारतीय विद्यार्थी सेनेतून काम सुरु
राजन साळवी यांची शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेना या विद्यार्थी संघटनेतून सुरुवात झाली होती. त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुख म्हणून उत्कृष्ट काम केले. साल २००४ मध्ये शिवतिर्थ येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा सन्मान केला होता.
पहिल्यांदा पराभव
राजापूर विधानसभा मतदार संघातील पोट निवडणूकीत त्यांचा साल २००६ मध्ये १,६०० इतक्या कमी मतांनी पराभव झाला होता. परंतू २००९ मध्ये राजापूर विधानसभा मतदार संघातून २५ हजार मतांनी विजयी झाले. त्यानंतर साल २०१४ मध्ये ते राजापूरातूनच ४० हजार मतांनी विजयी झाले. साल २०१९ मध्ये ते तिसऱ्यांदा शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. यंदा त्यांचा पराभव झाला.
यंदा विधानसभेत पराभव
राजन साळवी यांना २०११ च्या अणू प्रकल्प विरोधातील आंदोलनामुळे १९ दिवस तुरुंगात काढावे लागले. त्यांचा प्रवास एक शिवसेनेचा तळाचा कार्यकर्ता ते शिवसेनेचा नेता असा राहीला आहे. ते शिवसेनेचे तीन टर्म आमदार होते. परंतू तरीही त्यांना मंत्रीपद मिळाले नव्हते. महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर देखील ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत न जाता उद्धव ठाकरे यांच्या सोबत कायम राहीले. त्यांना ठाकरे यांनी ठाकरे गटाचा उपनेता केले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केला.
कोकणात मोठी गळती
रत्नागिरी जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारणरे मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, किरण सामंत असे तीन आमदार आहेत. कोकणात ठाकरे गटाकडे आता भास्कर जाधव हेच एकमेव आमदार उरले आहेत. विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने भास्कर जाधव नाराज आहेत. कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक सुद्धा लाचलुच प्रतिबंधक विभागाकडून कारवाईमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे असे नाराज नेते हेरण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे यांची शिवसेना करीत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List