सुनेत्रा पवारांच्या पराभवासाठी शिंदेंची यंत्रणा कामाला, महायुतीतील ‘गँगवॉर’चा लवकरच स्फोट होणार! – संजय राऊत
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून बारामती मतदारसंघात पवार कुटुंबियात लढत होणार आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना तिकीट दिले आहे. मात्र सुनेत्रा पवार यांचा पराभव व्हावा यासाठी शिंदेंची यंत्रणा काम करत आहे, असा गौप्यस्फोट करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुतीतील गँगवॉरचा लवकरच स्फोट होईल, असा दावाही केला. ते पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
बारामतीची लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. महाराष्ट्रातील 48 जागा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कोणीतरी दिल्ली-गुजरातचा ऐरागैरा येतो आणि बारामतीतत पवारांचा पराभव करून दाखवतो म्हणतो. बारामतीत शरद पवारांचा पराभव करून दाखवला हे त्यांना देशाला दाखवायचे आहे, पण हे शक्य नाही. आम्ही शरद पवारांसोबत असून शेवटी अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न होतो तेव्हा सगळे मराठी माणसं एक होतात, असेही संजय राऊत म्हणाले.
बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार मताधिक्य दिले नाही तर बघुन घेऊनच्या धमक्या देत आहेत. हा काय प्रकार आहे? ही भाषा शोभते का? तुम्ही खरे की पवार खरे हा निर्णय लोकांना घेऊ द्या, असेही ते म्हणाले. ‘सगळी भावंडे सुप्रियासाठी धावत आहेत, माझ्यासाठी कोणी फिरले नाही’ असे विधान अजित पवारांनी केले होते. यावरही राऊत यांनी भाष्य केले. सुप्रिया सुळे प्रचंड मताधिक्याने निवडून याव्यात असे प्रत्येकालाच वाटते. मोदी-शहांच्या नादी लागून महाराष्ट्रात तुम्ही ज्या पद्धतीनेदळभद्री, अमानूष राजकारण केले ते लोकांना पटलेले नाही, असे राऊत म्हणाले. तसेच ‘मी लढायला उतरतो ते जिंकण्यासाठी’, असे विधान अजित पवारांनी केले. मग 2019 ला त्यांचे चिरंजीव पार्थ पवार का पडले? असा सवाल करत अजित पवार यांनी स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी पक्षांतर केले आणि शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत आहेत. 2019 ला त्यांचे चिरंजीव पडले आणि आता त्यांच्या पत्नीच्या पराभवाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी शिंदेंची यंत्रणाही कामाला लागल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.
कोल्हापुरातील सभेमध्ये शिवसेनेला नकली म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही राऊत यांनी समाचार घेतला. मोदींना गांभीर्याने घेऊ नका. छत्रपतींच्या शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शहा कोल्हापुरात आले याची इतिहासात नोंद राहील. त्यांनी निवडणूक आयोग, घटनात्मक संस्था आपल्या पायाखाली घेतल्या असून त्या माध्यमातून शिवसेना-फडणवीस गट स्थान केला आणि आम्हाला नकली म्हणत आहेत. 4 जून नंतर याचे उत्तर जनता आणि आम्ही देऊ, असे आव्हानही राऊत यांनी दिले. तसेच 2014ला मोदींबाबत जी लोकभावना होती तीच आता राहुल गांधींबाबत आहे. राहुल गांधींच्या सभेला लाखो लोकं जमत असून जे प्रेम लोकांनी 2014 ला मोदींना दिले, त्याच भूमिकेत आता राहुल गांधी आहेत. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून 4 जूनला सरकार बदललेले दिसेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, उत्तर मध्य मुंबईतून भाजपने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट दिले आहे. तरी ती जागा महाविकास आघाडी 100 टक्के जिंकेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. तसेच मुंबईतील दोन ठिकाणी, मुख्यमंत्र्यांचा तथाकथित गड ठाणे येथील उमेदवार जाहीर झालेला नाही. कल्याण-डोंबिवलीतही अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. नाशिकचाही उमेदवार ठरलेला नाही. काही ठिकाणी फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार दिलेले आहेत. महाराष्ट्रात आम्ही 30-35 च्या आसपास जागा जिंकू आणि देशात इंडिया आघाडी 300 हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
#WATCH | Pune, Maharashtra: On INDIA alliance PM candidate, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, “… A coalition government is much better than a democratically elected dictator. Who we choose as our Prime Minister is our wish. We will even make two or four Prime Ministers in a… pic.twitter.com/P3qX0Db6wG
— ANI (@ANI) April 28, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List